Friday, 27 January 2017

बाबा..!!,जाऊ नको दूर

"..देव होता तू...,,देव होता तू...,खेळण्यातला माझा खेळ होता तू..."
व्वा...बापाचं एवढं सुंदर वर्णन केलंय काहो कुणी आजवर...केलं असेलही तरी फारंच क्वचित....आईबद्दल मैलोनं मैल लिहिणारे बापाचं नाव आलं की मात्र नाकं मुरडतात..हात आवरता घेतात...असं का..?? आईविना तिन्ही जगाचा स्वामी भिकारी आणि बापाविना कोण.?? श्रीमंत का..?? घरात तुमच्या आमच्यासोबत राहणारी आपली काळजी घेणारी आई सर्वश्रेष्ठ पण घराबाहेर आपल्या मुलांसाठी,कुटुंबासाठी सतत धडपडणारा,शिव्या खाणारा, प्रसंगी स्वतः ऊपाशी राहून तुमची आमची भूक भागवणारा बाप दुर्लक्षित का..?? मला नाही पटत हा भेदभाव म्हणून मुद्दाम लिहायला घेतलं..माझ्या आठवणीतला माझा बाप..
                     अगदी परवाची गोष्ट..पुण्याहून घरी येतोय, ऊशीर होईल , माझं मी पोचेन घरी तुम्ही तसदी घेऊ नका म्हणून सांगितलं होतं..गाडीतून ऊतरतो न ऊतरतो तोच समोर ऊन्हात गाडी घेऊन न्यायला आलेला बाप ऊभा...मी चालवू का ..?? म्हणून विचारलं, तर नको !! दमला असशील मागे बस म्हणाला...मग मागे बसून डोळै मिटून घरापर्यंत केलेला पंधरा मिनिटांचा प्रवास , माणूस म्हणून मला खरंच सम्रुद्ध करून गेला..सगळं कसं लख्ख डोळ्यासमोर होतं..
                    पैज लावायचा माझ्याशी लहानपणी..चांगले मार्क्स पडले तर हे घेऊन देईन ते घेऊन देईन..मीही मुर्खासारखा हट्ट करायचो..काही मागायचो वेड्यासारखं..वर्गातल्या ईतर पैसेवाल्या मुलांकडे बघितलेल्या गोष्टींसाठी हट्ट धरायचो..बापाची पंचायत व्हायची पण दिलेला शब्द त्याने कधी खाली पडू दिला नाही..स्वतःची हौस मारून माझे हट्ट पुरवले त्याने..तेंव्हा कळत नव्हतं..!! आता कळतं किती दमछाक झाली असेल त्याची...
                     दर रविवारी फिरायला बाहेर घेऊन जायचा..रोज नविन ठिकाणी..कधीच कंटाळा करायचा नाही..आठवडाभर काम केल्यावर मिळालेला त्याचा हक्काचा प्रत्येक रविवार त्याने माझ्यावर मुक्तहस्ताने ऊधळला..आईस्क्रिम द्यायचा नाही घेऊन खूप रागवायचा..खूप हट्ट करावा लागायचा..पण रात्री नाक गच्च झालं की रात्रभर जागायचा माझ्यासाठी.. त्याने हिशोब ठेवला नसेल कधी पण मी ठेवलाय हिशोब त्याने माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा
                     अभ्यासासाठी सकाळी सहा वाजता ऊठवायचा बाप मला..शाळा ९ वाजता..त्यावेळी राग यायचा,नाही आवडायचं..दोन मार्क कमी पडले तर कोणती जगबुडी येणारे असं वाटायचं..पण आता मोठा झाल्यावर,डाॅक्टर झाल्यावर कळतं त्या दोन मार्कांचं महत्व...मला सकाळी लवकर ऊठवून तो स्वतः कधीच नाही झोपला..तोदेखील तितकेच तास तितकीच मिनिटं जागला..मी जे जगलो तेच तोदेखील जगला..मी जिथे जिथे अडलो,रडलो,, तिथे तिथे तोदेखील अडला आणि रडला..मी एकंच आयुष्य जगलो तो मात्र दोन आयुष्य एकाचवेळी जगत होता..अडीअडचणींचे घाव सोसून हसण्याचं ढोंग सोसत होता...
                  नंतर शिक्षणानिमित्त परगावी घरापासून दूर राहू लागलो...खूप प्रलोभनं होती किंवा आहेत..पण का कुणास ठाऊक दारू,सिगारेट समोर असली तरी कधी हात ऊचलला गेलाच नाही..मुलींच्या मागे वेड्यासारखं फिरणं जमलंच नाही कधी..असलं काही मनात जरी आलं तरी मला ऊन्हात घाम पुसत गाडी घेऊन न्यायला आलेला माझा बाप  आठवतो..त्याने घेतलेले कष्ट आठवतात..
                   शेवटी एवढंच सांगतो की,आईचं महत्व आहैच पण बापाला मात्र विसरू नका...तो बोलून नाही दाखवणार, लाडाने आईसारखं कुशीत नाही घेणार,चमच्याने भरवणारदेखील नाही ..पण तो सकाळी पेपर वाचता वाचता तुमचाच विचार करत असतो..,बॅकेच्या लाईनमधे ऊभा असताना तुमच्या माघारी अनोळख्या माणसांशी तो तुमच्याबद्दलच आपुलकीने बोलत असतो..केवळ तुम्ही जिंकावं म्हणून बुद्धिबळात तो समजून ऊमजून चुकीच्या चाली  खेळत असतो,,केवळ तुम्हाला बरं वाटावं म्हणून तो धडपडत असतो कष्ट घेत असतो..तळहातावरील फोडासारखं जपलंय त्याने आपल्या सगळ्यांनाच, आता आपली पाळी, नाही का..??? ईतकं सगळं विचारांचं काहूर मनात माजलं असताना.. हाॅर्न वाजला घरी पोचलो..आई दारात ऊभीच होती..मी लगेच पुढे गेलो..पाया पडलो..आणि आईच्या मायेसमोर पुन्हा एकदा बाप मागे राहिला..
                                    © - निरागस
                   
                        

Saturday, 7 January 2017

..ती सध्या काय करते...

                       परवा कामानिमित्त परगावी गेलेलो..काम आटोपून मोबाईल ऊघडून बघितला तर निनावी msg..काय तर hw r u..?? अगदी एवढंच..पाठवणार्‍याने आपलं साधं नावदैखील लिहायची तसदी घेतली नव्हती..रोज ईतके हजारो msgs येतात..पण ही अक्षरं ओळखीची वाटत होती...क्षणभर डोळे बंद केले आणि मनात एकंच विचार आला..ती सध्या काय करते...???
                          कुणी असं एकादिवसात अचानक का आवडायला लागतं..?? कुणी असं कानामागून येऊन तिखंट का बनून जातं..??.फिरता फिरता चहाच्या टपरीवर पहिल्यांदा बघितलं तिला आणि नंतर रोज मित्रांबरोबर टपरीवर जायला लागलो..कधीच चहा न पिलेला मी रोज टपरीवर का चाललोय है कुणालाच कळेना..अगदी मलासुद्धा..मग बोलणं सुरु झालं, मैत्री झाली आणि मग मी कधी गुंतलो कळलंच नाही..
                           हवेत अधांतरी तरंगल्यासारखं वाटायचं अगदी त्या लहाणपणी आकर्षण वाटलेल्या कापसाच्या म्हातारीसारखं..मन कसं गच्च भरलेलं असायचं दिवसभर, दुसरा विचारंच मनात यायचा नाही मुळी..छोटी छोटी भांडणं, नंतरचे रुसवे फुगवे मग एकमेकांची समजूत आणि परत भांडणं..हे असं चालूच असायचं..खिशात पैसेच नसायचे खर्च करायला...एकाच दुकानात सलग दहावेळा एकच गोष्ट खाल्यानंतर तिने कंटाळून न रहावून विचारलंच शेवटी, की काय प्राॅब्लेम आहे तुझा..?? गंमत होती सगळीच..सगळं कसं मस्त मजेशीर रंगीबेरंगी..अगदी त्या चित्रकलेच्या वहीवर रंगात बुडवून ऊमटवलेल्या भेंडीच्या ठशांसारखं..
                           मग जसजसे दिवस सरले अभ्यास वाढला,काम वाढलं,कामाचा ताण वाढला,नोकरी,शिक्षण,आईवडील,जात,धर्म हजार अडथळे...आणि ही अडथळ्यांची शर्यत पार करता करता हातात घट्ट धरलेला हात कधी सुटला कळलंच नाही..पण आजही त्या आठवणी, ती गंमत मनात खोलवर कुठेतरी दडलेलं आहे..अगदी कपाटात दडवून ठेवलेल्या अत्तराच्या कुपीसारखं...ऊघडता देखील येत नाही की अडगळीत काढता देखील येत नाहि..आज सतिश राजवाडेंचा चित्रपट पाहिला आणि  सगळ्या आठवणी एका क्षणात डोळ्यांसमोरुन सरकल्या...
                        प्रेम असतं एखाद्या फुलपाखरासारखं..जोपर्यंत ते आपल्या हातावर बसतं तोवरंच ते आपलं असतं..एकदा ऊडून गेल्यावर मग त्यावर अधिकार नसतो सांगायचा..ते ठरवून करता येत नाही की ठरवून विसरता येत नाहि..जाणार्‍याला जाऊ द्यावं आणि आपण प्रेम करत रहावं...आकाशातला चंद्र कधीच हातात येणार नसतो म्हणून कुणी त्याच्याकडे बघायचं किंवा प्रेम करायचं  थांबवत नसतं अगदी तसंच..सतीश राजवाडे खरंच मनापासून धन्यवाद..आज माझ्यासारखे अनैकजण किंवा असा प्रत्यैकजण ज्यानै आयुष्यात एकदातरी मनापासून प्रेम केलं मनातून सुखावला असणार..या आमच्या नाजूक भावनांना वाट करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या पुढील चित्रपटासाठी आभाळाएवढ्या शुभेच्छा
                                       
                                              निरागस