Sunday, 16 April 2017

अन् मान शरमेने खाली जाते

" दिवाळीचे दिवस असतात,घराघरांत फराळाची देवाणघेवाण सुरू असते..घरी आलेल्या आपल्या मित्रमैत्रीणींना,दूरच्या नातेवाईकांना फराळ खाऊ घालण्यात आपण व्यस्त असतो..ईतक्यात दारावरची बेल वाजते..कोण आलंय आत्ता ईतक्यात ?? असं म्हणून आपण दारावरच्या छिद्रातून डोकावून बघतो..रोजचं घरकाम करायला आलेली कामवाली मावशी दरवाजावर असते...दरवाजा ऊघडण्याआगोदर आपण घाईगडबडीने फराळाचे डबे बंद करतो..धावतपळत सगळैचजण स्वयंपाकघरात जातो...सगळं आवरून दरवाजा ऊघडतो , तर मावशी फार कौतुकाने घरून आणलेला फराळाचा डबा ऊघडून समोर धरतै....

अन् मान शरमेने खाली जाते...!!

घाईगडबडीत आॅफीसला जाता जाता बुटाला पाॅलीश करायचं राहून जातं..म्हणून रेल्वेस्थानकाजवळच्या फाटके कपडे घातलेल्या पोर्‍यासमोर आपण आपला पाय सरकावतो..तो पाॅलीश करत असतानाच, आता याला पाच रूपये सुट्टे कुठून द्यायचे..?? छे..!! आता गेली दहाची नोट..याचंच दुःख आपल्याला जास्त असतं..पाॅलीश संपल्यावर काहीसं निराश मनानेच आपण खिशात हात घालतो..आपली अडचण समजून तोच पोर्‍या समोरून आपल्याला म्हणतो,साहेब सुट्टे नसतील तर पुढील वेळी द्या....!! त्याचे ते शब्द कानात शिसंं ओतल्यासारखे आरपार खोलवर रूततात.

अन् मान शरमेने खाली जाते...!!

बापाबरोबर फिरायला म्हणून आपण घराबाहेर पडतो...चौकात आॅफिसातले चार ऊच्चभ्रू मित्र-मैत्रिणी आपल्याला भेटतात... कमी शिकलेल्या,पंचा नेसलेल्या आपल्या बापाची ओळख कशी करून द्यावी..?? या विवंचनेत आपण चार पावलं पुढे जाऊन, बापाकडे पाठ करून मित्रांशी बोलू लागतो..आपली झालेली ही पंचायत ओळखून..बाप आपल्या खिशातला रूमाल काढून आपल्याकडे येत म्हणतो,डाॅक्टरसाहेब हा तुमचा रूमाल खाली मातीत पडला होता...धन्यवाद ऐकायलादेखील न थांबता ,तो तडक तसाच पुढे निघून जातो...

अन् मान शरमेने खाली जाते...!!

बसची वाट बघंत आपण झाडाखाली ऊभे असतो.फोनवर बायकोशी बोलणं सुरू असतं..दोघेही आपापल्या नोकर्‍यांमधे व्यस्त असल्याने छोट्या लेकराला,पोटच्या गोळ्याला वसतिग्रुहात ठेवण्यासंबंधी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असते..अशीच बोलता बोलता नजर भिरभिरंत दूरवरच्या वीटभट्टीवर काम करणार्‍या माऊलीवर जाते..कापडात गुंडाळून पाठीला लटकावलेलं तिचं तान्हं मूल दिसतं..हातातला मोबाईल गळून पडतो..

अन् मान शरमेने खाली जाते...!!

निवडणुकीसाठी म्हणून सरकारने सोमवारची सुट्टी जाहीर केलेली असते..शनिवारची जादा सुट्टी घेऊन तीन दिवस आपण सहपरिवार फिरायला म्हणून जातो..सोमवारी परत येताना चौकातल्या शाळेसमोर , ऐंशी वर्षांचा लखवा मारलेला म्हातारा खुर्चीवर बसून मत टाकण्यासाठी रांगेत ऊभा असलेला आपल्याला दिसतो..आपण मागे वळून बायकोकडे बघतो..तीही नजर चुकवते..

अन् मान शरमेने खाली जाते...!!

ढाब्यावर जेवणासाठी म्हणून आपण गाडी थांबवतो..हात धुवून जेवण सुरू करणार ईतक्यात भूकेने व्याकूळ झालेला भिकारी, फार आशेने हात पुढे करतो..आपण रागाने शिव्यांची लाखोली वाहून त्याला हुसकावून लावतो..जेवण संपवून ऊरलेलं अन्न आपण शहाण्यासारखं कचरापेटीत टाकतो..बील भरून गाडीत बसताना , ऊगाच आपली नजर जाते..तोच भिकारी आपण फेकलेलं ऊष्टं अन्न कचरापेटीत हात घालून शोधून शोधून खात असतो...डोकं सुन्न होतं..

अन् मान शरमेने खाली जाते...!!

नुकतांच आपला वाढदिवस होऊन गेलेला असतो..परिस्थिती नसताना बापाकडे हट्ट करून,रडून,रूसून आपण चार-पाच हजार वसूल करतो, मित्रांना चांगल्या हाॅटेलात पार्टी देतो..मित्रांची वाहवा मिळवून घरी येऊन पायातले मोजे काढंत असतो , तर बाप नवीन साबणाच्या मागील बाजूस ,जुना अर्धवंट संपलेला साबण चिकटंवत असतो..स्वतःःचीच स्वतःःला लाज वाटू लागते..

अन् मान शरमेने खाली जाते...!!


( ता.क. - असे कित्येक हजारो अनुभव रोज आपल्याला येत असतात..माणूस म्हणून सम्रुद्घ करून जात असतात..आयुष्य म्हणजे शेवटी काय आहै..?? ते शिकवंत असतात...)
                                   

                                    -©- निरागस


Sunday, 9 April 2017

जगावेगळा मास्तर

                     "          शाळेतला पहिला दिवस आठवतो काहो तुम्हाला..??,, हो, बालवाडीतला पहिला दिवस..ऊलट्या पायांनी चालत गेलेलो आपण सगळैचजण..रडतरडत..क्षणभरासाठी वाटूनदेखील गेलं मनात, की आई-बाबांना ईतके नकोसे झालोत का आपण.??.तुमच्यापैकी काही विसरलेदेखील असतील हे सगळं, पण मी नाही विसरू शकत...कारण माझ्या मास्तरसारखा हरहुन्नरी मास्तर सगळ्यांच्या नशीबात असूच शकत नाही...
                              माझं बालपण चिपळूण जवळच्या एका खेड्यात गेलं..घरची परिस्थिती सामान्य होती...म्हणजे मुबलक जेवण मिळायचं,अंगभर घालायला कपडे मिळायचे आणि महत्वाचं म्हणजे अभ्यासाबाबतीत कोणतीही तडजोड नसायची..सांगायचं कारण असं, की माझ्या शाळेतल्या निम्याहून अधिक मुलांना दोनवेळचं जेवण मिळायची भ्रांत असायची..कुणीतरी राजकारणी निवडणुकीच्या मुहुर्ताला पाच वर्षांतून कधीतरी गणवेशाचं वाटप करायचा...मग पुढील पाच वर्षै चिंध्या झाल्या तरी मुलांना घरातून नवीन गणवेश मिळायचे नाहीत...पण तिथे श्रीमंत गरीब असा भेदभाव नव्हताच मुळी कधी..सगळ्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतंच जायची...हो खरंच..आमच्या गावात आजही ते काय म्हणतात ना junior kg,senior kg हे असले फाजील लाड पसरलेले नाहीत...
                            असो,तर पहिल्या दिवशी माझा बाप मला सोडायला आलेला शाळैत..शाळेच्या आवारात गेलो तर संपूर्ण शाळा शेणाने सारवण्याचा कार्यक्रम चालू होता...टोकदार नाकाचा,घार्‍या डोळ्यांचा, विजार मांडीपर्यंत दुमडलेला एक अनोळखी माणूस हातात खराटा घेऊन मुलांचं नेत्रुत्व करत होता..बाप जवळ जाऊन विचारता झाला..,अमुक अमुक गुरूजी कुठे भेटतील..??,हातातला खराटा बाजूला टाकत, विजार खाली घेत तो माणूस ऊत्तरला,बोला मीच...!! बापाचा लगेच पुढचा प्रश्न.., मुलांना असं कामाला जुंपणं सरकारदरबारी मान्य आहे का..?? साहेब ..!! पोरं स्वतःचं घर समजून करताहेत काम..स्वतःच्या घराची निगा राखणं चुकीचं असतं का कधी..?? बापाचा विश्वास बसला शाळा कशीही असूदे मास्तर अवलिया आहे..आणि बाप माझा हात सोडून घराकडे चालायला लागला..
                           पहिले काही दिवस केवळ रडण्यात गेले..नंतर मात्र ओळखी झाल्या,मित्र,मैत्रिणी झाले..मास्तरशी परिचय झाला आणि मनातली भीती दूर झाली..पहिली ते चौथी चार ईयत्तांना मिळून ऐक मास्तर..विश्वास नाही बसंत..?? पण खरंच...चारही ईयत्तांना तो ऐकटाच शिकवायचा...मध्यभागी स्वतः बसायचा आणि सभोवताली विद्यार्थ्यांना बसवायचा..तल्लीन होऊन शिकवायचा...पोरांना जीव लावायचा..पार जीव ओतून द्यायचा प्रत्येक गोष्टीत..ऐखादी गोष्ट केवळ करायची म्हणून कधीच केली नाही त्याने...दहाची शाळा असायची पण मास्तर आठ वाजताच हजर.., दहा किलोमीटर चालंत यायचा.., सायकल ढकलंत ढकलंत आणायचा पण चालवायला कधीच वर बसला नाही..चालवायची नसते तर आणायचा कशाला ?? आज प्रश्न पडतो मला..तेंव्हा मनात आला असता प्रश्न,तर कदाचित ऊत्तर मिळालं असतं..सायकलला डबा बांधला की निघाला मास्तर..
                           ईतिहास शिकवण्यात मास्तरचा हातखंडा,प्रसंग असे काही वर्णन करून शिकवायचा की  वाटायचं  ऊचलावी तलवार आणि जावं पावनखिंड लढवायला...तो काही फार मोठा ग्रेट शिक्षक म्हणून माझ्या लक्षात नाही..पण तो एक आगळावेगळा,कलंदर,जगावेगळा आणि अदभुत माणूस म्हणून माझ्या लक्षात आहे...शाळैतल्या प्रत्येक पोरावर मास्तरचा विलक्षण जीव..शाळा आणि शाळैतली मुलं यापलिकडे त्याचं जगंच नव्हतं मुळी दुसरं..एखादा मुलगा दोन- तीन दिवस शाळेत नाही आला की मास्तर चौकशी करायला घरी पोचायचा...शाळैचा पट कमी होऊ नये यापेक्षा गावातल्या गरीबांच्या मुलांनी शिकावं यावर त्याची भिस्त जास्त असायची...
                             ऐकदा विज्ञान मेळाव्यात भाग घ्यायला घेऊन गेला जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हा दोघा-तिघांना..काहिबाही करून घेतलेलं आमच्याकडून त्यानं त्याला जमेल तसं..त्याच्या बुद्धीला पटेल तसं...जिल्ह्याचा सरडा येऊन आमची थट्टा करून निघून गेला...आम्ही तिसरी चौथीतली नाकाचा शेंबूड  पुसता न येणारी पोरं काय बोलणार..?? हसं झालं आमचं..मास्तर दूरूनंच पहात होता...पण आज तो काहीतरी वेगळं करणार याची मला आतून चाहूल लागली होती...त्याच्या कपाळावरची धमणी कधी नव्हे ती धडाधडा ऊडंत होती..बक्षिस समारंभ सूरू झाला..बक्षिस वाटपानंतर मास्तर ऊभा राहिला, मला बोलायचंय म्हणाला ऊपस्थित असलेल्या सगळ्यांशी...आणि परवानगी घेऊन बोलायला ऊभा राहिला...आणि काही बोलायच्या आतंच रडायला लागला...मग रडू आवरंत कठोर शब्दात म्हणाला..शाब्बास..!! व्वा काय प्रोत्साहन दिलंय मुलांना...याचा त्यांना त्यांच्या ऊर्वर्रीत आयुष्यात झालाच तर फायदाच होईल...मी ईतिहासाचा शिक्षक आहै,मला नाही कळंत विज्ञानातलं फारसं..सरकारकडून एक छदाम मिळालेला नाहिये आम्हाला मदत म्हणून.. स्वतःची पदरमोड करून घेऊन आलो ईथवर यांना ..जिंकायला नव्हे तर तुमच्यासारखी कागदी माणसं दाखवायला..!! मग आमच्या तिघांकडे बघून म्हणाला,बाळांनो ही अशी माणसं तुम्हाला पावलोपावली भेटतील,टोचून बोलतील,अपमान करतील ,तेंव्हा हरून जाऊ नका...माझी आठवण काढा, डोळे बंद करा व पुढे चालंत रहा..रस्ता संपत नाही तोवर चालत रहा..!! आवाज ऐकू येत नाही तोवर चालू रहा..!! चालून चालून छाती फुटत नाही तोवर चालत रहा...त्या तिघांपैकी ऐक अवेळीच वारला काहीसा आजार होऊन,दुसरा चिपळूणातल्याच एका मोठाल्या हाॅटेलात भांडी घासायचं काम करतो आणि तिसरा मी आज डाॅक्टर झालोय...
                       नंतर शाळा सुटली तशा भेटीगाठी कमी झाल्या...पण रस्त्यात भेटला की आवर्जून थांबायचा..विचारपूस करायचा..पोरांनो परिस्थितीमुळे मला शिकता आलं नाही पण तुम्ही मात्र भरपेट शिका..!! सांगायला विसरायचा नाही अजिबात...मग घरापासून लांब कोल्हापूरला आलो mbbs च्या शिक्षणासाठी..मास्तर कुठेसा आजारी होता त्या दरम्यान, सुट्टीवर होता...घरी निरोप ठेवला...आठवणीत होता ,पण भेटीगाठी पूर्णतः थांबल्या होत्या...मग ऐकेदिवशी  मास्तर थेट माझ्या काॅलेजच्या वाचनालयात आला...विचारत विचारत..मला मित्राने फोनवर सांगितलं तुला शोधतंय कुणीतरी..त्याने केलेल्या वर्णनावरून पक्क माहिती पडलं मास्तरंच असणार...!!! अंगावरल्या कपड्यांनिशी जसा होतो तसा धावंत आलो..बघतोय तर मास्तर आंब्याच्या झाडाखाली कापंड पसरवून झोपला होता...घोरत होता..बसलो तिथेच त्याच्या पायाशी तासभर...नाही ऊठवलं...माहिती नव्हतं शेवटचा कधी झोपला असेल ईतका निवांत...त्याचाच पाय लागला मला आणि तो दचकून जागा झाला...दोघांचेही डोळे पाणावले...मी विचारलं मास्तर ईकडे कसं काय..?? तर म्हणाला माझ्या गुरूंकडे न्यायचंय तुला...मला काहीच कळेना...मला घेऊन गेला कुठल्याशा खेडेगावात त्याच्या गुरूंकडे...त्यांच्या हस्ते सत्कार केला माझा..मग त्या दोघांच्या अध्यात्मावरल्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या...मला काहीचं कळंत नव्हतं..मी केवळ मास्तरकडे ऐकटक बघत होतो..अधूनमधून डोळ्यांतल्या अश्रूंना वाट करून देत होतो..
                      डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं..नसेल माझी शाळा माझ्या ईतर मित्रांच्या शाळेऐवढी मोठी..,हो मी शिकलोय शेणाने सारवलेल्या, डोक्यावर पत्रे घातलेल्या शाळेत...पण हे जे काही मी मिळंवलंय ते अद्वितीय आहै...तुमच्या लाखो रूपये डोनेशन घेणार्‍या शाळांमधे हे प्रेम,ही आपुलकी असूचं शकत नाही...माणूस म्हणून घडलोय मी ईथे...आयुष्य काय असतं...ते ईथे ऊमजलंय मला...आजही मास्तरचा मधेच फोन येतो...ऐकायला कमी येतं त्याला आजकाल...पण मनात काळजी असते, आपला विद्यार्थी ठीक तर आहे ना...?? कुठे सापडतात हे असे शिक्षक..?? ही असली मोह,मत्सर,लोभ न शिवलेली माणसं..?? सांगा ना..!!..काय करायचं ह्यांचं.?? कसं सांभाळून ठेवायचं यांना..?? बंदिस्त काडेपेटीच्या डब्यात कोंडलेल्या मुंगळ्यासारखं आयुष्य जगणारे आपण या अशा अद्भुत माणसांकडून काहीतरी शिकणार आहोत का...?? "
                    

                                   -©- निरागस

           

Wednesday, 5 April 2017

मानवी मनाचा क्षुद्रपणा

"   बर्‍याच दिवसांपासून डोक्यात होता विषय.,विषय म्हणजे अनुभवंच म्हणा की..!! बर्‍याच म्हणजे अगदी नाही म्हटलं तरी आठ नऊ वर्षै..आज नको, ही योग्य वेळ नाही,ऊद्या बोलू .!! करत करत ईतके दिवस वाया गेले..का तर मित्रांना काय वाटेल..?? तुटणार तर नाहीत ना ?? वगैरे वगैरे...पण हल्ली मनावरंच घेतलंय मी तसं..जे ईतर कुणीही बोलत नाहीत, ते आपण बोलायचं...सगळ्यांच्या फाटक्यात पाय घालायचा..दररोज , दिवसभर वेड्यासारखं वागायचं...लोकं काय म्हणतील ?? ,दुखावली तर जाणार नाहीत ना..?? यासारख्या तकलादू प्रश्नांना मूठमाती द्यायची..आणि म्हणून लिहितोय यावर..
                   बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती..बापाची ईच्छा होती पोराने डाॅक्टरंच व्हावं..आणि मला जे आयुष्यात करायचंय त्यातून माझ्या पोटापाण्याची काही सोय होईल असं मलाही वाटंत नव्हतं ,म्हणून मग आधी डाॅक्टर होऊ नंतर आपलं काय ते करू, या निर्धाराने मुंबईत दाखल झालो...मुंबईत विले-पार्लै भागात महिना दोन महिने बापाने राहण्याची सोय केली होती..आता खरी गोष्ट सुरू..सोसायटीमधे बहुतांश नव्हे तर सगळैच ब्राह्मण...खोली भाड्याने देतानाच बजावण्यात आलं होतं मांस,मासे घरात आणून खाल्लेले चालणार नाहीत वगैरे वगैरे..मीही अभ्यासासाठी आल्याने या क्षुल्लक अटी मान्य केल्या आणि अभ्यासाला सुरूवात झाली...mbbs ला प्रवेश मिळवायचा याच ईर्षैने अभ्यास सुरू झाला...
                        शेजारी कोण राहतं कळायला पंधरा-वीस दिवस गेले..दोन शेजारी लाभलेले...ऐक महाप्रौढी आणि दुसरा तितकाच समंजस...आणि या दोघांमधे राहणारा,घरातून पहिल्यांदा बाहेर राहणारा, सतरा अठरा वर्षांचा मी..घरी आईने जशा चांगल्या सवयी लावल्या, तशा वाईट सवईदेखील जडवल्या..जसं आजही मला जेवण नावाचा प्रकार बनवता येत नाही...maggy बनवण्यापुरतंदैखील पाककौशल्य आमच्यात नाही...कपड्यांना ईस्त्री करतो कशीबशी पण त्यांची घडी घालता येत नाही वगैरे वगैरै..आलं असेल लक्षात तुमच्या...तर अशा या माझा अभ्यास करत करत ईतर गोष्टी करतानाचा संघर्ष शेजारच्या काकूंच्या लक्षात आला..तू आमच्याकडे जेवायला येत जा..!! असं त्यांनी मला स्वतःहून बजावलं...मी नको म्हटल्यावर म्हणाल्या डब्याचे पैसे आम्हाला देत जा हवं तर..!! जर तुला पटंत नसेल तर..मग मीदेखील विचार केला..घरचं जेवण मिळणार असेल तर काय वाईट आहै..आणि हळू हळू जेवणासकट,कपडे धुणे,ईस्त्री वगैरे वगैरे माझ्या गरजेच्या सार्‍या गोष्टी त्या काकू करू लागल्या...त्याचा मोबदलादेखील घेत होत्या...एकंदरीत कसं छान सुरू होतं...
                  मग अचानक ऐके दिवशी त्यांनी बोलावून सांगितलं..की ऊद्यापासून जेवण वगैरे देता येणार नाही तुला...मला काही कळायला मार्ग नाही..न रहावून मी विचारलं माझं काही चुकलं का...?? त्या काही न बोलताचं निघून गेल्या...दोनैक दिवसानंतर त्यांच्या मुलाकडून मला कळलं ,की मी ब्राह्मण नसल्यामुळे त्यांनी माझे कपडे धुवू नयेत किंवा माझी ईतर कामे करू नयेत वगैरे  त्यांना सोसायटीतल्या लोकांकडून बजावण्यात आलं होतं..आणि यावर चक्क चर्चा होत होती सोसायटीमधै..किती बिनडोक लोकं असू शकतात नाही का..?? .क्षणभर डोकं सुन्न झालं..रडावसं वाटलं..जातीभेदाबद्दल ऐकलं होतं,वाचलं होतं पण तो अनुभवला नव्हता ,कधीच...कधी विचारदैखील केला नव्हता की हे असं ईतकं भयंकरपणे आजही रूजवलं आणि पोसलं जातंय...सोसायटीत काहीही कार्यक्रम असेल तर मला सोडून सगळ्यांना बोलावलं जायचं...हातात दिलेल्या निमंत्रण पत्रिका मी ब्राह्मण नाहिये म्हटल्यावर काढून घेतल्या जायच्या...या व अशा अनेक गोष्टी...
                   आत्ता हिंमत करावी कुणी,दात घशात घालीन..पण तेंव्हा लहान होतो...फार विचित्र वाटायचं...आपल्यासारखीच दिसणारी  पण आपल्यातली नसणारी माणसं,पदोपदी त्यांच्या तुच्छतापूर्ण नजरा, पचवणं किती अवघड होतं त्याकाळी..मग काही दिवसांनी शेजारच्या काकूंच्या मनाला पुन्हा पाझर फुटला आणि त्यांनी पुन्हा जेवणासाठी विचारलं..पण यावेळी मात्र मी साफ नकार दिला...स्वतःचे कपडे स्वतः धुवायला,ईस्त्री करायला लागलो...जेवणासाठी बाहैर खाणावळ बघितली...आणि अभ्यास केला..स्वतःचं अस्तित्व सिद्ध  करण्याच्या ईर्षैनै..
                        गणरायाच्या क्रुपेने आज डाॅक्टर आहै..पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे वैचारीक गोष्टींवर बोलू अथवा विचार करू शकतो..मी जात पात मानत नाही..धादांत खोटं आहे हे...मूठभर लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बहुतांश लोकांना वेठीस धरण्याचा त्यांच्या ईच्छा,आकांक्षा दडपण्याचाच हा प्रकार आहै..तसा मी खुल्या प्रवर्गात मोडतो...मलाच जर या गोष्टींचा ईतका त्रास सहन करावा लागत असेल तर वर्षानुवर्षै वाळीत टाकलैल्या,मंदिरात देवाचं दर्शन,विहिरीत पिण्याचं पाणी नाकारलं गेलेल्या माझ्या ईतर बांधवांचं दुःख आपण कधीतरी समजून घेऊ शकतो का..??आजच्या भारतात जातीयवाद नाही असं म्हणणारे ऐकतर गाढव आहैत किंवा अज्ञानी आहेत...आणि यात केवळ ऐकाच समाजाला दोष देण्यात अर्थ नाही...मराठ्यांचे आरक्षणासाठी निघणारे मोर्चै,त्याला प्रत्युत्तर म्हणून निघणारे दलितांचे मोर्चै हेदेखील तितकेच जातीयवादी आहेत...माझ्या संदर्भात म्हणाल तर मला कमीपणा दाखवणारे जसे ब्राह्मण होते तसेच किंवा त्याहून अधिक ब्राह्मण केवळ माझी गैरसोय न व्हावी म्हणून मला स्वतःच्या घरी जेवायला वाढणारे होते..मूठभर नालायक लोकांच्या अनुभवावरून संपूर्ण समाजाला दोषी ठरवायचं, की चांगल्या लोकांकडे अधिक लक्ष देऊन चांगल्या प्रव्रुत्ती अधिकाधिक पुढे न्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न...!! "
( तळटीप - ब्राह्मण्यवादाला विरोध आहे,ब्राह्मणांना मुळीच विरोध नाहि )
   
                           -©- निरागस