Friday, 9 December 2016

..लगीनघाई..

                 मी नाही जात सहसा सार्वजनिक कार्यक्रमांमधे.कारण काही मोजके अपवाद वगळता सगळेच कार्यक्रम म्हणजे स्वतःच्या आर्थिक सुबत्तेचं ओंगाळवाणं प्रदर्शन करण्यासाठी मिळालेल्या संधीसारखे साजरे केले जातात..आणि त्यातली बहुधा सगळीच माणसं बोगस असतात..तरीही कधीमधी मित्रांच्या, आप्तेष्टांच्या आग्रहाखातर किंवा कधीकधी केवळ एक व्यावसाईक शिष्टाचार म्हणून तटस्थपणे राहतो ऊपस्थित.अशाच एका लग्नसमारंभात मागल्या बाकावर बसून केलेला लोकांचा  अभ्यास शब्दांत मांडण्याचा  हा प्रामाणिक प्रयत्न...
                     बेंदूर पोळ्याला सजवलेल्या बैलासारखे सजवलेले ते दोन जीव नवीन आयुष्याची सुरुवात करायला चालले होते..मुळात नवीन चांगल्या गोष्टीची सुरुवात ईतक्या गोंगाटातच का बरे करावी लागते...?? हेच मला कळत नाही..कुठेतरी शांत वाहणार्‍या नदीकाठी, निवडक मित्रांसमवेत, आईवडिलांच्या आशीर्वादानंतर सुर्यासमोर नतमस्तक होऊनदेखील ऊभयतांच्या आयुष्याची सुरुवात होऊच शकते की..?? पण हे असले स्वतःचे फाजील लाड केले नाहीत तर मग माणसात आणि त्या निष्पाप पशु पक्षांमधे अंतर तरी काय राहणार..?? असो...
                       मुलगी अधूनमधून मुलाकडे बघून काहीसं बोलायचा प्रयत्न करत होती आणि मुलग्याला मात्र ते काही केल्या ऊमगतंच नव्हतं..पण त्यांच्या त्या प्रसन्न मुद्रा बघून याची खात्री पटली की ते दोघेही खुष होते...कितीही कठीण वेळ आली तरी एकमेकांचा हात सोडणार नव्हते...निदान पहिल्या दिवशीतरी एकंदरीत हाच रागरंग दिसत होता...आणि कदाचित त्या संपूर्ण चार-पाचशे लोकांमधे ते दोघेच खुष होते...मनातल्या मनात त्यांना शुभेच्छा दिल्या आणि नजर फिरवली
                       स्टेजच्या एका कडेला दबक्या पावलाने चालणारा.डोक्यावरच्या टोपीने अधूनमधून आपला घाम पुसणारा आणि घाम पुसायच्या बहाण्याने सारखं घड्याळातील काट्यांकडे पाहणारा माणूस दिसला...आजच्या घडीला तो एकतर मुलीचा बाप असू शकतो किंवा घरात दडवून ठेवलेल्या कोट्यावधींच्या जुन्या नोटांची काळजी करणारा कोट्याधीश...दुसर्‍या विंगेत अंगात शुभ्र पांढरा सदरा आणि डोक्यात गांधी टोपी घातलेला एक माणूस सारखे काही हातवारे करत होता..ऊभ्या ऊभ्याच जणू त्याने एकहाती सगळा कार्यक्रम तोलून धरला होता..तो मुलग्याचा बाप असणार वेगळं सांगायलाच नको...बरोबर स्टेजच्या मध्यभागी बसलेले भटजीबुवा दिसले..मला यांचं प्रयोजन कळलंच नाहीये आजतागायत.. मीच काय ती प्रुथ्वीप्रदक्षिणा घालून आलोय आणि माझ्याव्यतिरिक्त  ईतर सगळे गाढव आहेत क्षुद्र आहेत अशा अविर्भावात असणारा यांचा वावर मला लहानपणापासून खटकतो.यांनी अख्या मनुष्यगण आणि देवगणाला वेठीस धरलंय असा माझा नुसता समज नाही तर द्रुढ समज आहै...पण मिळालेली जबाबदारी ते लिलया पार पाडत होते..मी बोलणार आहे त्यांच्याशी एकदिवस सविस्तर..निदान त्यांच्या घरात तरी सगळे खुष आहेत का..?? विचारावं म्हणतोय एकदा..
                          फिरत फिरत स्टेजवरुन खाली आली नजर तर नुसता किलकिलाट चालू होता..कुणालाही त्या लग्नाशी काहीहि देणघेणं नव्हतं..कुणी आपली नवीन घेतलेली साडी हाॅलमधल्या ईतरांपेक्षा वेगळी कशी आहे हे पटवून सांगत होतं..तर कुणी दागिन्यांवरच्या चर्चैत व्यस्त होतं...कुणाला जेवण आवडलं नव्हतं तर कुणाला पार्किंगच्या व्यवस्थेबाबत आक्षेप होते..कुणाला फोटोग्राफर पटला नव्हता तर कुणी sound system वर टीका करण्यात मग्न होता..सगळ्यांचा  मात्र demonitization वर  जास्त जोर होता..अगदी ईतिहासाचा शिक्षकदेखील नरेंद्र मोदींनी काय चुकवलं हे पटवून सांगत होता.. एकंदरित काय तर कुणीच खुष नव्हतं आणि ते नसतातचं कधी..त्यांचं तरी काय चुकलं ?? कारण हा  मानवी स्वभाव आहे...थोडक्यात सांगायचं तर कोणिही ऊस्फुर्तपणे आलेलं नव्हतं..प्रत्येकाची स्वतःची गणितं होती..आणि ईथं न आल्याशिवाय ती सुटणारी नव्हती..
                          तर अशा या मंगलकार्यात कोणी जबाबदारी पार पाडत होतं तर कुणी शिष्टाचार..कुणी जेवणाला प्राथमिकता देत होतं तर कुणी फोटो काढून घ्यायला..मग शेवटी डोळे मिटले आणि विचार केला..या असल्या फुटकंळ लोकांना बोलावणं खरंच गरजेचं असतं का..?? असं करुन कसं चालेल लोकं काय म्हणतील..?? तसं करुन कसं चालेल लोकं काय म्हणतील..?? हीच काय ती लोकं..?? यांच्यासाठीच जगायचं असतं का आयुष्यात..?? स्वतःची हौस,स्वतःची खोटी प्रतिष्ठा स्वतःच्या मुलांवर लादणार्‍या प्रत्येक आईवडिलांनी याचा खरंच खूप गांभीर्याने विचार करावा. वरणात मीठ जास्त पडलं म्हणून लग्न बरं होतं म्हणणार्‍या या लोकांना निदान माझ्या आयुष्यात तरी तिळमात्र स्थान नाही... 
                - निरागस



10 comments:

  1. छान सुबक सविस्तर वास्तवाला धरूण मांडणी आहे..

    ReplyDelete
  2. ..धन्यवाद..वाहेगुरु

    ReplyDelete
  3. हुबेहूब वर्णन केले आहे लग्न समारंभाचे. मास्तर तुमच्या लेखणीला आता चांगलीच धार अली आहे.एखाद्या लग्ना मध्ये जाऊन आल्यागत वाटलं. एकदम रोखठोक आणि भेदक आहे. काहींना आवडणार नाही पण मला आवडलं बुवा, नवीन लेखाची वाट बघतोय.. लिहत रहा..

    ReplyDelete
  4. हुबेहूब वर्णन केले आहे लग्न समारंभाचे. मास्तर तुमच्या लेखणीला आता चांगलीच धार अली आहे.एखाद्या लग्ना मध्ये जाऊन आल्यागत वाटलं. एकदम रोखठोक आणि भेदक आहे. काहींना आवडणार नाही पण मला आवडलं बुवा, नवीन लेखाची वाट बघतोय.. लिहत रहा..

    ReplyDelete
  5. ..धन्यवाद भास्कर आणि रुपेश

    ReplyDelete
  6. अप्रतिम... माणुस हा सामजिक प्राणी आहे,तरी तो सामजिक पणा सोडुन प्राणीपण जास्त दाखवतो..

    ReplyDelete
  7. ..धन्यवाद भूषण आणि तौसिफ

    ReplyDelete
  8. मनातले विचार शब्द रुपात पहिले. धन्यवाद !!!

    ReplyDelete